Thread Ceremony, Brahmachari proceeding to Guru's house for Education

उपनयन

संस्कृतमधे 'उप + नी' या धातूचा अर्थ जवळ नेणे असा होतो, म्हणजेच विद्याभ्यासासाठी गुरुच्या सान्निध्यात नेणे.  विद्यागुरूच्या जवळ जाण्याचा हा संस्कार आहे म्हणून हा मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा संस्कार ठरतो.

या संस्कारास 'व्रतबंध' असेही संबोधतात.  'व्रतबंध' म्हणजे 'व्रत / नियमांची बद्धता'.  म्हणजेच  पर्यायाने बालकाला व्रतांच्या कुंपणात ठेवणे होय.  या वेळेपासून निरनिराळ्या व्रतांचा अवलंब करून संयमी व यशस्वी जीवनाचा पाया घातला जातो म्हणून 'व्रतबंध' हे नाव योग्य आहे. ही व्रते व नियम मानवी जीवनातील चार आश्रमांपैकी सर्वात पहिल्या म्हणजेच 'ब्रह्मचर्य' आश्रमातील ब्रह्मचर्यव्रताच्या संदर्भात असतात.  'उपनयन' संस्काराद्वारे उत्तमपणे ब्रह्मचर्यव्रताचे पालन कसे करावे हे शिकवले जाते.  उत्तम व निकोप शारीरिक तसेच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने अत्यावश्यक असतात.  हीच बंधने विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून मनावर अधिक प्रभावीपणे ठसतात.  

या संस्कारात, विधी करताना बटूच्या कंबरेत 'मुंज' नावाच्या दर्भाची दोरी (मेखला) बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने कामे करण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कंबर कसली जाते.  कंबरेत बांधली जाणारी मेखला अत्यंत उपयुक्त आहे.  मेखला कंबरेत बांधल्यामुळे हर्निया वगैरेसारखे रोग होत नाहीत.  त्याचप्रमाणे तरुणपणी पोट सुटणे, कंबरदुखी वगैरे विकृती दूर राहू शकतात.  म्हणून याला 'मौंजीबंधन / मुंज' असेही म्हणतात. 

कोणत्याही हिंदू संस्काराचा मुख्य पाया आरोग्यच आहे.   'वट्' या संस्कृत धातूचा अर्थ बांधणे असा होतो म्हणून त्या बालकास कित्येकदा 'बटू' असेही म्हणतात.  उपनयनानंतर बटूचा ब्रह्मचर्याश्रम सुरु होतो. 

या संस्कारासाठी आठव्या वर्षाचे महत्व अधिक आहे कारण या वेळेस मुलगा स्वावलंबनास योग्य बनतो.  या संस्कारासाठी उत्तम काळ चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, माघ, फाल्गुन हे महिने होय

चौल संस्कार पूर्वी जर झालेला नसेल तर पुण्याहवाचन व चौलहोम करावा (जर उपनयनापूर्वी घरी पुण्याहवाचन केलेले असेल तर नुसते गणपतीपूजन केले तरी चालते).  बोलावलेल्या न्हाव्याकडून डोक्यावरील सर्व केस काढून फक्त शेंडीचा घेरा ठेवावा.  बटूला आंघोळ घालून नवे कपडे घालावेत.  डोक्यावर व पायावर स्वस्तिक काढून त्याच्या कपाळी मुंडावळ बांधावी.

उपनयन संस्कारातील विधी खालीलप्रमाणे आहेत.

१)  मातृभोजन : हा लौकिक विधी आहे.  यामधे बटू, त्याची आई व अष्टवर्ग (त्याच्याच वयाचे ८ बटू, ज्यांची मुंज झालेली आहे) यांचा भोजनविधी करावा.  यामधे पोळी, भात यासारखे पदार्थ न देता हलक्या फराळाच्या पदार्थांचा समावेश करावा. 

२) अक्षतारोपण : बटू व त्याच्या वडिलांनी समोरासमोर पाटावर बसावे.  बटूच्या हातात नारळ देऊन दोघांमधे अंतरपाट धरावा.  आप्तांनी मंगलाष्टके म्हटल्यावर शुभ मुहूर्तावर अंतरपाट बाजूला करावा.  वडिलांनी मुलाचे मुख पाहावे व त्याच्या गळ्यात हार घालावा.  बटूने स्वत:च्या हातातील नारळ वडिलांना द्यावा व त्यांना वाकून नमस्कार करावा.  वडिलांनी मुलाला त्यांच्या उजव्या मांडीवर बसवावे.  गुरुजींचे मंत्र म्हणून झाल्यावर उपस्थितांनी अक्षता बटूच्या डोक्यावर वाहाव्यात.

३) अग्निस्थापना : होमकुंडात यजमानाने अग्निस्थापना करावी.

४) वस्त्रधारण : वडिलांनी मुलास करगोटा बांधून कौपीन (लंगोटी) नेसवावी.  त्यावर शुभ्र पंचा मानेशी गाठ मारून नेसवावा व भगव्या रंगाचे उपरणे त्याच्या खांद्यावर द्यावे.

५) अजिनधारण : पूर्वीच्या काळी अजिन (हरणाचे कातडे) बटूला धारण करण्यास दिले जात असे.  सांप्रत, अजिनाचा छोटा तुकडा सुतामध्ये ओवून ते बटूच्या उजव्या हातात घालून नंतर गळ्यात घालावे.

६) यज्ञोपवीतधारण व आचमनविधी : यजमानाने गायत्री मंत्राचा १० वेळा जप करुन यज्ञोपवीत (जानवे) मुलाच्या उजव्या हातात घालून नंतर गळ्यात घालावे.  त्यानंतर मुलाकडून आचमनविधी करवून घ्यावा.

७) प्रधानहोम : यजमानाने समंत्रक तुपाच्या आहुती होमामधे द्याव्यात.

८) अवक्षारण : बटूचे चित्त पवित्र व्हावे व सूर्याची त्याच्यावर कृपा व्हावी म्हणून हा विधी करतात.  जमिनीवर ताम्हन ठेवून त्यावर बटूची ओंजळ धरावी.  त्याच्या ओंजळीत खारीक, बदाम, सुपारी व पैसे ठेवून त्यावर वडिलांची ओंजळ धरावी.  वडिलांच्या ओंजळीत पाणी घालावे व ते त्यांनी मुलाच्या ओंजळीत सोडावे.  बटूने ओंजळीतील सर्व वस्तू पाण्यासहित ताम्हनात सोडाव्यात.  या ठिकाणी बटूला त्याच्या वडिलांकडून प्रथमच उपनयनातील नवीन नावाने संबोधले जाते.

९) अग्निकार्य : वडिलांनी मुलाकडून संक्षिप्त अग्निकार्य करवून घ्यावे.  त्याचा उजवा हात धुवून अग्नीवर धरावा व तो गरम झालेला हात त्याला त्याच्या तोंडावरून फिरवावयास सांगावा.  तसेच त्याच्याकडून अग्निप्रार्थना करवून घ्यावी.

१०) विभूतिग्रहण : होमातील विभूती पळीस लावून घ्यावी व ती बटूला त्याच्या शरीरावर ६ ठिकाणी त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावयास सांगावी.

११) गायत्री उपदेश : बटूचा उजवा तळात डाव्या तळहातावर ठेवावा व ब्रह्मांजली मुद्रा करुन ती त्याच्या उजव्या मांडीवर ठेवावी.  वडील व बटू यांनी दोघांच्या डोक्यावरुन एकत्र एक वस्त्र पांघरून घ्यावे व त्यानंतर वडिलांनी मुलाच्या उजव्या कानात गायत्री मंत्राचा उपदेश करावा व त्याच्याकडून तो तीन वेळा म्हणवून घ्यावा.

१२) मेखलाधारण : 'मुंज'नावाच्या दर्भाची दोरी (मेखला) करुन ती बटूच्या कंबरेत घट्ट बांधावी.

१३) दंडधारण : शक्यतो बटूच्या उंचीचा पळसाचा दंड  (जाड काठी) त्याच्या हातात द्यावा व त्याच्याकडून गुरुजींनी मंत्र म्हणवून घ्यावा.  (पूर्वीच्या) काळात रानावनातून फिरताना स्वसंरक्षणासाठी याची आवश्यकता असे.  सांप्रत, त्याचा उद्देश लोप पावला आहे).

१४) आचारबोध : गुरुजींनी बटूला त्याचे ब्रह्मचर्याश्रमातील वर्तन कसे असावे ते समजावून सांगावे.

१५) भिक्षावळ : तांदूळ, फ़राळाचे पदार्थ इत्यादींची बटूला त्याचे आई-वडील व उपस्थितांतील जवळच्या नातेवाईक मंडळींनी भिक्षा घालावी व ती बटूने गुरुजींकडे सुपूर्त करावी.

या ठिकाणी उपनयन संस्कार समाप्त होतो.

उपनयनाच्या दिवशी संध्याकाळी बटूकडून सायंसंध्या करवून घ्यावी.  त्यानंतर अनुप्रवचनीय होम करावा व चौथ्या दिवशी 'मेधाजनन' विधी करावा.

अनुप्रवचनीय होम : या छोटेखानी होमामधे भाताच्या ३ आहुत्या दिल्या जातात.

मेघाजनन : कुंडीमधे पळसाची फांदी मातीत खोचून त्याची पूजा करतात.  बटूने गुरुजींनी म्हटलेल्या मेधासूक्ताचे श्रवण करावे.

यानंतर घरी बसवलेल्या देवाकाचे उत्थापन करावे.  जर मेधाजनन चौथ्या दिवशी केले तर देवकोत्थापन पाचव्या किंवा सातव्या दिवशी करावे.

संपर्क करा




सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ